पुणे || राज्यातील सर्व शाळा दरवर्षी १५ जूनला सुरू होतात. परंतु यंदा शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यासंदर्भात सुरुवातीला काढलेल्या परिपत्रकात सोमवारपासून (ता.१४) शाळा सुरू होतील, असा उल्लेख होता. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ३० एप्रिल रोजी सुधारित परिपत्रक काढत शाळा येत्या मंगळवारपासून (ता.१५) सुरू होतील, असे स्पष्ट केले.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी, म्हणून दरवर्षी शिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय आणि सैनिकी शाळांच्या सुट्ट्या लागू केल्यात जातात. उन्हाळी सुट्ट्या १४ जूनपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मंगळवार पासून सुरू होणार आहे. तर विदर्भात २८ जूनपासून शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सुधारित परिपत्रकात म्हटले आहे.

शाळा नेमक्या कधी सुरू करायच्या याबाबत सुधारित परिपत्रकमुळे स्पष्टता झाली असली तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप न दिल्याने शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे.