धरणग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करू - चंद्रकांत पाटलांचे प्रा. शिवाजीराव बंडगर यांना आश्वासन

Jan 31, 2024 - 18:19
 0  319
धरणग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करू - चंद्रकांत पाटलांचे प्रा. शिवाजीराव बंडगर यांना आश्वासन

आय मिरर( विजयकुमार गायकवाड)

पुढील आठवड्यात सोलापूरात उजनीच्या पाण्या संदर्भात आढावा घेऊन धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर याचेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान केले. 

प्रा.बंडगर यांनी बुधवार ( ता.३१) रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत समक्ष भेट घेऊन उजनीच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील 19 धरणातून पाणी उजनी जलाशयात सोडावे अशी जोरदार मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्या वेळी पालमंत्र्यानी हे आश्वासन दिल्याचे बंडगर यांनी सांगितले आहे.    

उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून जलाशयाच्या काठावरील शेतकरी भिगवण येथे गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी११ वाजता रास्ता रोको आंदोलन करीत असून या पार्श्वभूमीवर प्रा.बंडगर यानी आज मुंबईत समक्ष पालकमंत्री यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की ,पुढील आठवडय़ात या बाबतीत शासकीय अधिकारी व संघर्ष समिती यांची बैठक लावून आढावा घेण्यात येईल व पुढील निर्णय घेण्यात येईल. या वेळेस बंडगर यानी वरच्या धरणातून पाणी उजनीत सोडण्याच्या मागणी बरोबरच चालू असलेले अनाठायी आवर्तन बंद करावे,समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे ,कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे प्रतिनिधी घ्यावेत याही मागण्या केल्या. दरम्यान गुरवारी दि.०१ फेब्रुवारी रोजी भिगवण येथे होणाऱ्या रास्ता रोकोला लोकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow