पत्नीचा मृतदेह खाली उतरवून स्वत: घेतला गळफास; दोघांत नेमकं काय घडलं?

आय मिरर
राजस्थानच्या जयपूर शहरातील मुहाना परिसरातील दादू दयाल नगरमध्ये एका विवाहित दाम्पत्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
मृत व्यक्तींची नावे धर्मेंद्र चौधरी (वय 35) आणि सुमन चौधरी (वय 30) अशी असून, दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
पत्नीची विनवणी, पतीचा निर्धार... अन् शेवटी दुर्दैवी शेवट
घटनेपूर्वीचे काही क्षण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. गुरुवारी दुपारी धर्मेंद्र कार सुरू करताना दिसतो. सुमन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतेय. ती कारजवळ उभी राहत त्याला विनवणी करतेय, 'नका ना जाऊ...' पण धर्मेंद्रने तिला बाजूला करत गाडी मागे घेतली.
त्यानंतर दोघांमध्ये वाद होतो. अखेरीस धर्मेंद्र कार पार्क करतो आणि दोघे पुन्हा एकत्र बोलताना दिसतात.
रात्रीच दोघांनी गळफास घेतला?
गुरुवारी रात्री 10:56 वाजता मिळालेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही एकत्र अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना दिसतात. सुमनच्या हातात बॅग असते. त्यानंतर ते कोणालाही पुन्हा दिसले नाहीत. याच रात्री दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आधी सुमनने आत्महत्या केली, नंतर धर्मेंद्रने..
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलंय की, सुमनने आधी आत्महत्या केली. धर्मेंद्रने तिचा मृतदेह पाहून तो खाली उतरवला. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश न आल्यावर त्यानेही गळफास घेतला. कोणतीही सुसाइड नोट घटनास्थळी आढळून आली नाही.
जोडप्याला दोन लहान मुलं
धर्मेंद्र फायनान्स कंपनीत काम करत होता, तर सुमन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. हे जोडपं मूळचं भरतपूर जिल्ह्यातील असून, जयपूरमध्ये राहत होतं. त्यांची दोन लहान मुले गावी आहेत. कुटुंबीयांनी शनिवारी दोघांचे मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले.
पती-पत्नीमध्ये खरंच वाद होता का?
मुहाना पोलिस स्टेशनचे SHO गुरु भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'पती-पत्नीमध्ये वाद होते का, याचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले असून सखोल तपास सुरू आहे.'
What's Your Reaction?






