वादा पूर्ण करायचाच नव्हता तर वादा केलाच कशाला ? महादेव जानकरांचा अजितदादांना सवाल

May 12, 2025 - 06:41
May 12, 2025 - 07:07
 0  570
वादा पूर्ण करायचाच नव्हता तर वादा केलाच कशाला ?  महादेव जानकरांचा अजितदादांना सवाल

आय मिरर 

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांनी आता सरकार विरोधात रणशिंग फुंकलं आहे. विधानसभा निवडणुकी वेळी महायुतीने काही आश्वासनं दिली होती. दादाचा वादा अशी जाहीरात केली गेली. पण वादा पूर्ण करायचाच नव्हता तर वादा केला का असा प्रश्न महादेव जानकर यांनी केला आहे.

सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, वीज माफी द्यावी ही आश्वासने पूर्ण करावीत अशी मागणी जानकर यांनी केली. त्यासाठी लाँगमार्च काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितलेय.

महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आता नव्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात त्यांनी युपीए सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने महादेव जानकर नाराज झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहीजे, अशी मनातील खदखदही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेस सोबत जाणार असल्याचे म्हटले नसलं तरी आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्यास आम्ही काँग्रेस सोबत जाऊ असेही जानकर म्हणाले. तर  कर्जमाफीसाठी आपल्या पक्षाकडून लाँग मार्च काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महायुतीने निवडणूक काळात आश्वासन दिले होते.

ते आश्वासन पाळले गेले पाहीजे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. आश्वासन पाळायचे नव्हते तर दिले कशाला असा प्रश्न ही त्यांनी केला आहे. हे आश्वासन आता सरकारला पूर्ण करावेच लागेल. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात उतरणार असल्याचं ते म्हणाले. 

राजकारणात कायमचा कुणी मित्र आणि शत्रु नसतो. त्यामुळे आगामी काळात आपण भाजपची साथ सोडू शकतो असे संकेत जानकर यांनी दिले आहेत. जानकर यांनी लोकसभा निवडणूक महायुतीकडून लढवली होती. त्यांनी लोकसभेत नशिब आजमावण्याचा प्रयत्न ही केला होता. त्यांच्या प्रचाराला पंतप्रधान मोदी ही आले होते. पण त्यांना निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. त्यानंतर मात्र जानकर हे महायुतीत बाजूला फेकले गेले. त्यामुळे आपला योग्य सन्मान होत नाही अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच त्यांनी वेगळी वाट धरण्याचं ठरवलं आहे.   

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow