समीरने परफेक्ट प्लॅन रचला, पण तीन गोष्टीने डाव उलटला ! अंजली च्या हत्येची इनसाईड स्टोरी...

Nov 10, 2025 - 18:55
Nov 10, 2025 - 19:00
 0  1520
समीरने परफेक्ट प्लॅन रचला, पण तीन गोष्टीने डाव उलटला ! अंजली च्या हत्येची इनसाईड स्टोरी...

आय मिरर 

बॉलिवूड चित्रपटांनाही लाजवेल असं थरारक हत्याकांड पुण्यात घडल्याचं समोर आलं आहे. बहुचर्चित दृश्यम चित्रपटाची चार वेळा पारायणं करुन आरोपी पतीने पत्नीची हत्या केली. तिचा मृतदेह भट्टीत जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पत्नीच्या फोनवरुन तिच्या मित्राला 'आय लव्ह यू' असा मेसेजही पाठवला. मात्र पत्नीचं अफेअर असल्याचा खोटा संशय निर्माण करणाऱ्या पतीचा बनाव पोलीस तपासात उघड झाला.

समीर जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने ३८ वर्षीय पत्नी अंजली समीर जाधव हिची हत्या केली. अंजली एका खाजगी शाळेत शिक्षिका होती, तर समीर हा ऑटोमोबाईल डिप्लोमा धारक असून त्याचे गॅरेज होते. २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांना तिसरी-पाचवीत शिकणारी दोन मुलं असून शिवणे परिसरात चौघं राहत होते. घटनेच्या वेळी दिवाळीच्या सुट्टीत ती गावी गेली होती.

समीरने २६ ऑक्टोबर रोजी अंजलीला एका गोदामात नेले. तिथे गळा दाबून त्याने अंजलीची हत्या केली. समीरने आधीच तिथे एक लोखंडी भट्टी तयार करुन ठेवली होती. त्यामध्ये अंजलीचा मृतदेह जाळून त्याने राख जवळच्या नदीत फेकून दिली.

पोलिसांना सुरुवातीला वाटले की समीरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिची हत्या केली. मात्र, तपासात असे समोर आले की समीरचे स्वतःचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

अंजलीला चारित्र्यहीन ठरवण्यासाठी समीरने तिच्या फोनवरून तिच्या एका मित्राला 'आय लव्ह यू' असा मेसेज पाठवला. त्यानंतर त्याने स्वतःच त्या मेसेजला उत्तर दिले, जेणेकरून तिच्या अफेअरचा खोटा डिजिटल पुरावा तयार होईल.

अंजलीच्या हत्येनंतर समीरने पोलीस ठाण्यात जाऊन ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तो वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीबद्दल चौकशी करत होता आणि मारेकरी कधी सापडतील असे विचारत होता. मात्र त्याच्या या वागण्यामुळेच पोलिसांना संशय आला.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, समीरच्या सततच्या चौकशीमुळे, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणामुळे आणि तांत्रिक तपासातून पोलिसांना हे प्रकरण उलगडण्यास मदत झाली. समीरच्या जबाबांमध्ये आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये तफावत आढळल्याने त्याला अधिक चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिथे त्याने गुन्हा कबूल केला आणि सांगितले की त्याने 'दृश्यम' हा चित्रपट चार वेळा पाहून हत्येची योजना आखली होती.

या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow