विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा - डॉ गीता मगर

Oct 13, 2023 - 16:09
 0  583
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा - डॉ गीता मगर

आय मिरर

डोळे हा आपल्या शरीराचा सर्वाधिक नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांमुळे आपण या जगाचा आनंद घेत असतो.अनेकदा डोळ्यांच्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. कोरोना काळात विद्यार्थ्याचा टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आदींशी अधिक संपर्क आल्याने डोळ्यांवर गंभीर परिणाम झाला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन नेत्ररोग तज्ञ डॉ.गीता मगर यांनी केले.

इंदापूर महाविद्यालयात जागतिक दृष्टी दिनानिमित्त विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने प्रसिद्ध रोग नेत्ररोग तज्ञ डॉ. गीता समीर मगर यांचे विद्यार्थी जीवनावर मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे आयोजन एमएससी द्वितीय वर्ष आणि बीएससी तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी एमएससी प्रथम वर्ष विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.जयश्री गटकुळ होत्या. 

डॉ. गीता समीर मगर म्हणाल्या कि,कोरड्या डोळ्यांची समस्या असलेल्यांची संख्या 2030 पर्यंत शहरी भागात साधारणत: 40 टक्क्यांपर्यंत असेल. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे.भरपुर पाणी पिणे, सकस आहार, डोळ्यांचा व्यायाम अशी काळजी घेतल्यावर या समस्यांमधून तुम्हाला आराम मिळू शकतो.

आधुनिक युगात मोबाईल, संगणक आदींचा वापर करणे आवश्‍यक असले तरी, शक्य तेवढा या गोष्टींचा वापर कमी करावा. डिजिटल साधनांपासून निघणारे निल किरणे आपल्या डोळ्यांना हानी पोहचवू शकतात. काम करीत असताना स्क्रीनपासून 20 ते 24 इंचाचे अंतर ठेवावे. सोबत त्याचा ब्राइटनेस कमी करावा. वारंवार पापण्या उघडबंद कराव्यात. तासात 10 ते 20 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा कॅम्प घेणे अत्यंत गरजेचे असून पुढील काळात विद्यार्थ्यासाठी नेत्र तपासणी कॅम्प साठी सहकार्य होईल असे मत डाॅ. मगर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्रा. जयश्री गटकुळ, लिनेस क्लब अध्यक्ष उज्वला गायकवाड,सुनंदा अरगडे, प्रा. उत्तम माने, प्रा.राजेंद्र भोसले प्रा.सचिन खरात, प्रा.विशाल चिंतामणी, प्रा.प्रशांत साठे, प्रा.योगेश झगडे, प्रा.श्वेता खोपडे, प्रा.मोनिका भुजबळ, प्रा.कविता गौंड, प्रा.माधुरी गलांडे, प्रा.धनश्री आवारे,राजू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow