इंदापूरात केंद्रच्या माध्यमातून विकासाच्या योजना राबविणार - हर्षवर्धन पाटील 

Jun 12, 2024 - 07:02
 0  236
इंदापूरात केंद्रच्या माध्यमातून विकासाच्या योजना राबविणार - हर्षवर्धन पाटील 

आय मिरर                

केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली स्थिर व मजबूत सरकार स्थापन झाले आहे. नूतन केंद्र सरकारच्या माध्यमातून व त्यांच्या आर्थिक सहाय्यातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी शेतीचा पाण्याचा प्रश्न, उद्योगधंदे, अँग्रो प्रोसेसिंग आदी विकासाच्या योजना आगामी काळामध्ये राबविण्यात येणार आहेत. केंद्रातील सत्तेचा उपयोग इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी केला जाईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.11) दिली.              

इंदापूर येथे पत्रकारांची संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नूतन मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्यास मी उपस्थित होतो. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारताच 100 दिवसांचा विकासाचा रोड मॅप तयार केला आहे. देशातील सर्वसामान जनतेचे, सर्व समाजाचे हे सरकार राहणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना इंदापूर तालुक्यात राबविण्याचे नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींसह राज्यातील सहा नूतन मंत्र्यांचे या कामी आपणास सहकार्य मिळणार आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील नमूद केले. इंदापूर तालुक्यासाठी सिंचनाचा आराखडा तयार केला जाईल,असेही त्यांनी सांगितले.           

ते म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी आंम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. प्रचार यंत्रणा कमी पडू दिली नाही. तरीही निवडणुकीत यश मिळू शकले नाही. कोठे चुका झाल्या, मतदान का मिळाले नाही? संदर्भात ज्या त्या पक्षाच्या स्तरावर उहापोह केला जाईल. प्रत्येक निवडणुकीतून शिकण्यासारखे काही असते. त्यातून बोध घेऊन, सुधारणा करून पुढील वाटचाल करू. या निवडणुकीत महायुतीला मतदान केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. इंदापूर येथे इंदापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीची बैठक दि. 13 रोजी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.             

इंदापूर तालुक्यात सध्या 57 टँकरने पाणी चालू असून, सध्या पाऊस झालेला असला तरीही लगेच टँकर बंद करू नका, असे आंम्ही प्रशासनास सांगितले आहे. इंदापूर तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे, त्या संदर्भात कृषी आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यात समन्वय हवा. सत्तेचा उपयोग हा समाजाच्या प्रगतीसाठी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी करायचा असतो, असेही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, मारुती वनवे, अँड.मनोहर चौधरी, बाबा महाराज खारतोडे, अँड.अशोक कोठारी, रघुनाथ राऊत, अशोक इजगुडे, राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow