आयाराम गयारामांना संधी देऊ नका ! निष्ठावंत कार्यकर्त्याचं शरद पवारांना निनावी पत्र

Sep 18, 2024 - 13:15
 0  591
आयाराम गयारामांना संधी देऊ नका ! निष्ठावंत कार्यकर्त्याचं शरद पवारांना निनावी पत्र

आय मिरर

बारामती नंतर आता पुण्याच्या दौंड मध्ये देखील सोशल मीडियात निनावी पत्र फिरू लागली आहेत.एक निष्ठावंत कार्यकर्ता अशा निनावी नावाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लिहिलेले एक पत्र सध्या सोशल मीडियात वायरल होत आहे. ज्या पत्राद्वारे आयाराम गयारामांना आपल्या पक्षातून संधी देऊ नका अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गेल्या दहा वर्षापासून दौंड तालुक्यावर राहुल कुल यांची सत्ता आहे. 2009 पासून दौंडचं नेतृत्व राहून कुल करत आहेत. सलग दोन वेळा रमेश थोरात हे राहुल कुल यांच्याकडून पराभूत झाले आणि याच पराभवाचा वाचपा काढण्याच्या तयारीत रमेश थोरात असतानाच मागील वर्षभरापूर्वी अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आणि रमेश थोरात यांची गोची झाली.त्यामुळेच रमेश थोरात हे शरद पवार गटाकडून तुतारी वरती दौंड ची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही इच्छापूर्ती होण्यापूर्वीच शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि इच्छुकांनी रमेश थोरात यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या अजित पवार गटात असलेले दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे शरद पवार गटाकडून म्हणजेच तुतारीच्या चिन्हावर उद्याची विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेवेळी रमेश थोरात हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात होते आणि त्यामुळेच या सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या पत्रातून रमेश थोरात यांचे नाव न घेता त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यास शरद पवार गटाच्या दौंड मधील कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

रमेश थोरात यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम केले आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पक्षासाठी निष्ठावंत असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला आगामी विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करू लागले आहेत. त्यामुळे दौंडला आगामी विधानसभेसाठी शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

काय लिहलेय पत्रात……

प्रति

आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब

अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

आदरणीय साहेब

साहेब मी आपणास सूचना करावी एवढा मी नक्कीच मोठा नाही परंतु गेल्या दोन वर्षात राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या आणि आपल्या पक्षाला परिणामी तुम्हाला जो वैयक्तिक त्रास सहन करावा लागला हे अत्यंत वेदनादायी आणि क्लेशदयक घटना होत्या. राज्यातील भाजपने आपल्या पक्षाचे तत्कालीन नेते अजित पवार यांना फोडून भाजप बरोबर सत्तेत येण्यास भाग पाडले त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात शरद पवार यांचे राजकारण संपणार अशी चर्चा रंगू लागली. परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यात शरद पवार हे नाव या घटनेनंतर अधिकच चर्चेला येऊ लागले.त्यातच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेल लावलेला पैलवान म्हणून देशभरात चर्चा असणाऱ्या तुमच्या नावाला आणि कर्तुत्वाला साजेसाच निकाल संपूर्ण राज्याने महाविकास आघाडी सरकारला दिला. यात महाविकास आघाडीतील मुख्य नेते म्हणून तुमचं मोठे योगदान आहे.मतदारांना तुमच्या बरोबर आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या बद्दल झालेल्या विश्वासघातकी राजकारण पटलं नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यभरात तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. तशीच परिस्थिती आमच्या दौंड तालुक्यात देखील आहे. परंतु साहेब मी तुमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी भावना व्यक्त करू इच्छितो,

तुम्ही दौंड तालुक्यात ज्या ज्या लोकांना राजकारणात मोठे केलं त्यांनीच आपल्या सुप्रियाताईंना पराभूत करण्यासाठी विडा उचलला.यात कुणी देवेंद्र फडणीस यांचे गळ्यातील ताईत होते तर कोण अजित पवार यांचे राजकीय गुरु होते.परंतु अडचणीच्या काळात आपल्याबरोबर काही मोजकेच नेते राहिले. आपली निष्ठा तुमच्या पायाशी अर्पण करून ते वादळात दिवा लावायला निघाले आणि त्यात आप्पासाहेब पवार,रामभाऊ टुले,नामदेव ताकवणे अशा मोजक्याच लोकांचा समावेश होता. यांनी लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली आणि दौंड तालुक्यातील मतदारांनी आरोग्य दूत आणि सहकार महर्षी यांना तुमची सुरुवात शरद पवार या नावापासून झाली आहे हे विसरू नका हे दाखवून दिले. आपल्या सुप्रियाताईंना 25000 मतांची आघाडी या तालुक्यातील मतदारांनी दिली. हीच आघाडी आपल्याला विधानसभा निवडणुकीत मिळावी म्हणून काही राजकीय सधी साधूंनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या आमदारकीचे स्वप्न तुमचं नाव मागे असेल तरच पूर्ण होऊ शकतं असं त्यांना आता वाटू लागले आहे. परंतु साहेब दौंड तालुक्यातील जनता तुम्ही ज्याला उमेदवारी द्याल त्याला आमदार बनवेल अशी राजकीय परिस्थिती सध्या दौंड तालुक्यात आहे. त्यामुळे साहेब तुम्ही आयराम गायाराम नेत्यांना आपली दारे उघडी ठेवू नका आणि उमेदवारी निष्ठावंत उमेदवार ला द्या. त्यांना आम्ही जीवाचं रान करून निवडून आणू असा शब्द या पत्रांच्या निमित्ताने तुम्हाला देतो.तुम्हाला पत्र लिहावं एवढी माझी पात्रता नसली तरीही ते एक धाडस मी करत माझं मन मोकळं केलं आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. 

- एक निष्ठावंत कार्यकर्ता

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow