गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...
आय मिरर
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य आहे असे माझे अजिबातच मत नाही. वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल बोलणे हे योग्य नाहीये. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बोललो आहे. त्यांनाही मी याबद्दल सांगितले आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. ते देखील यासंदर्भात माझ्याशी बोलले आहेत, मी देखील त्यांना सांगितले. अशाप्रकारच्या विधानांना आम्ही कधीच समर्थन करणार नाहीत. गोपीचंद पडळकर हे तरूण नेते आहेत. अनेकदा ते बोलताना आपल्या अग्रेशनचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले की, आपण अग्रेशन लक्षात घेऊनच बोलले पाहिजे.
तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघत असतील याचा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना दिला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईतील स्टील महाकुंभात पोहोचले होते. यावेळी त्यांनी मोठे भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुंबईत स्टील महाकुंभ संपन्न झाला. स्टील उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा चाैथ्या नंबरवर आहे.
पण मला विश्वास आहे की, पुढच्या आठ वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल. आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही केंद्र शासनाची मदत घेऊ. या महाकुंभाची थीम ग्रीन स्टील आहे. ग्रीन स्टीलसाठी 5 हजार कोटींचा निधी आहे. यामुळे 1 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. गडचिरोली नवीन स्टील हब तयार होत आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जगभरात आता ग्रीन स्टीलची मागणी वाढली आहे. गडचिरोलीतील सिस्टीम इतर जिल्हांसाठी महत्वाची ठरतंय.
What's Your Reaction?