बारामतीत उमेदवारी मागे घेण्यास एक दिवस असताना मोठी घडामोड ! नक्की काय घडलं ?

Apr 8, 2026 - 20:22
Apr 8, 2026 - 20:29
 0  359
बारामतीत उमेदवारी मागे घेण्यास एक दिवस असताना मोठी घडामोड ! नक्की काय घडलं ?

आय मिरर 

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या 53 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते.उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस अवधी असताना सहा अपक्ष उमेदवारांनी आपला दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात 47 उमेदवारांची अर्ज आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या सहा अपक्ष उमेदवारांपैकी पाच अपक्ष उमेदवार बारामती तालुक्यातील आहेत तर एक पंढरपूर मधील अपक्ष उमेदवार आहे. 

यामध्ये विलास बाबुराव होळकर सदोबाचीवाडी, माऊली जमादार कांबळे विठ्ठलवाडी खांडज,राहुल बाळासो थोरात मुढाळे बारामती, अमोल यशवंत कोकरे पणदरे बारामती, अशोक रामचंद्र खामगळ खामगळवाडी बारामती आणि रजाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी पंढरपूर अशी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांची नावे आहेत.

मात्र असं असलं तरी या पोटनिवडणुकीतून काँग्रेस आपली उमेदवारी मागे घेणार का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता उमेदवारी मागे घेण्यासाठी केवळ एक दिवसाचा अवधी उरला आहे.

बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून देखील यासाठी प्रयत्न केले जात असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बारामती पोट निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी या संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते बोलण्याची शक्यता असून जर सर्वांच्या विनंतीला काँग्रेसने मान दिला तर कदाचित उद्या ऐनवेळी काँग्रेस या निवडणुकीतून माघार घेऊ शकते. मात्र अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात आपल्याशी कोणत्याही भाजप नेत्यांचे बोलणं झालेलं नाही असं ट्विट केल्याने या निवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार की निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याशिवाय या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली आहे. करुणा मुंडे यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावं लागेल आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करावी लागणार आहे. दुसरीकडे अभिजीत बिचकुले यांनी देखील या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकूणच जरी काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली तरी देखील मैदानात असलेल्या इतर अपक्ष उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनवणी करावी लागणार हे मात्र नक्की.

जर यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं तर ही निवडणूक बिनविरोध होईल आणि जर अपयश आलं तर मग मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मात्र निवडणूक लागली तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी एकतर्फी विजय होणार हेही तितकच खरं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow