अखेर संघर्ष योद्धा जिंकला ! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारकडून मान्य
आय मिरर
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबईत मोठा विजय मिळाला असून हैदराबाद गॅझेट सरकारने मान्य केले आहे. तासाभरात यासंदर्भातील जीआर सरकार काढणार असून तो हाती आल्यानंतर गुलाल उधळत जरांगे मुंबईत खाली करणार आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर तत्काळ काढला तर रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करणार, असे मनोज जरांगे म्हणाले.
जीआर लवकरच काढणार असल्याचा शब्द मराठा उपसमितीने जरांगेंना दिला आहे. मनोज जरांगेंनी सरकारचा अंतीम मसुदा मान्य केल्यानंतर आझाद मैदानात एकच जल्लोष झाला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.
मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील. एक तासात सर्व जीआर काढा आणि आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर अंतिम निर्णय सांगू... - सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर काढा आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा... सर्वकाही सुरुळीत झाले तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील.
सातारा गॅझेट लागू करण्यासाठी 1 महिन्याची मुदत...
राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीत गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.
सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो. सातारा गॅझेटियर तथा पुणे आणि औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्यावर कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे. या प्रकरणी 2-3 मुद्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत.पण सरकारने त्यावरही 15 दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच सातारा गॅझेट लागू करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयऱ्यांच्या मुद्यावरही आमची चर्चा झाली. महाष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्याची विनंती आम्ही केली होती. सरकारने विविध ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत. उर्वरित ठिकाणचे गुन्हे कोर्टात जाऊन मागे घेण्यात येतील. या प्रकरणाची कारवाई सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल. सरकारने याविषयी आम्हाला लेखी हमी दिली आहे. ही गोष्ट जीआरमध्येही येईल. यावर मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत
What's Your Reaction?