का व्हायचंय अजित पवारांना संचालक ? माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा लागणार कस

संपादकीय...
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारखान्याच्या 21 संचालक पदांच्या जागांसाठी 22 जून रोजी मतदान पार पडणार आहे. जवळपास 19 हजार 700 सभासदांचा असणारा हा साखर कारखाना बारामती तालुक्यातील सहकारातील महत्त्वाची संस्था आहे.
त्यामुळे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. बारामती जरी पवारांच्या नावाने ओळखली जात असली तरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांचा मात्र कस लागतो.
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवार्षिक काळात मागच्या पाच वर्षात हा कारखाना चालवला गेला मात्र आता या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक आणखीच रंगतदार आणि चुरसदार होणार यामध्ये शंका नाही.
अजित पवारांनी या निवडणुकीत ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अजित पवारांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल ? त्याचा उहापोह आपण करणार आहोत.
माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यात असला तरी या कारखान्यावरती सत्ता मिळवण्यासाठी कस लागतो. सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पॅनल असणार आहे. चंद्रराव तावरे हे एक शरद पवारांचे चाळीस वर्ष सोबत असणारे कार्यकर्ते होते. परंतु ज्यावेळी अजित पवार राजकारणात आले त्यावेळी अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांचे खटके उडू लागले आणि कालांतराने चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली.
चंद्रराव तावरे हे थेट पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले. चंद्रराव तावरे हे जरी ज्येष्ठ नेते असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे माळेगाव सहकारी साखर कारखान्यात राहिलं आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सभासद हा जागृत सभासद आहे. कारखाना त्याचा प्रपंचाचा विषय असल्यामुळे जो जास्त भाव देईल त्याच्या पाठीमागे हा सभासद उभा राहतो. 2019 साली अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालचे पॅनल निवडून आलं आणि त्यानंतर पाच वर्षे त्यांनी सलग कारभार केल्यानंतर आता निवडणूक लागली आहे.
या निवडणुकीत स्वतः अजित पवार उमेदवार असतील तर त्यांच्याकडे बघून पॅनल टू पॅनल मतदान होईल,क्रॉस वोटिंग होणार नाही यासाठीच अजित पवारांनी उमेदवारी दाखल केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जर गालबोट लागलं तर अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. मागच्या पाच वर्षाचा कारभार बघता विरोधकांची झालेली एकजूट बघता अजित पवारांना संचालक मंडळ निवडून येईल असा विश्वास नाही म्हणून अजित पवारांनी उमेदवारी दाखल केली का ? असाही कयास बांधला जात आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनते. चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधकांचे पॅनल असतं. चंद्रराव तावरे हे सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात तसेच शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांचे घनिष्ट संबंध आहेत असे देखील बोललं जातं. अजित पवारांना माहिती आहे,की बारामतीतील ही एकमेव संस्था आहे जी अजित पवारांची प्रतिमा मलीन करू शकते किंवा सुधारू शकते. बारामतीच्या राजकारणावर जर अजित पवारांना आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर माळेगाव कारखान्यावरती आपली सत्ता असणं हे देखील तितकच महत्त्वाच आहे. कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून आणि सभासदांवरती भावनिक दबाव रहावा यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे का? अशी चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने सांगत आहेत की मी जर संचालक मंडळात असेल तर कारखान्याचे प्रश्न माझ्या माध्यमातून लवकर मार्गी लागतील आणि कारखान्याचा विकास लवकर होईल.मात्र विरोधक असलेले चंद्रराव तावरे यांची स्वतःची मत आहेत, त्यांची वोट बँक आहे आणि त्यामधूनच ते कारखाना जिंकणार असल्याचा निर्धार करत आहेत. अजित पवार सत्तेचा गैरवापर करत आहेत असा देखील आरोप विरोधकांकडून केला जात आहे. जरी त्यांनी सत्तेचा वापर केला तरी आम्हीच निवडणूक जिंकणार असा विश्वास विरोधकांना आहे.
मात्र या निवडणुकीत किती पॅनल पडतात आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नेमकी कोणाला साथ देतात किंवा त्यांचा निर्णय काय असू शकतो की इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती कारखान्याचा पॅटर्न माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतही लागू होऊ शकतो का? यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतील.
What's Your Reaction?






