"त्या तिघा कामगारांचा गुदमरून मृत्यू" पुण्याच्या पुरंदर मधील धक्कादायक घटनेने बेलसर हादरलं
आय मिरर
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.रविवारी दि.२६ एप्रिल रोजी दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.मृत्यू झालेले तिघेही कामगार हे उत्तर प्रदेश मधील मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
1) पिंटू राजेश प्रसाद वय.23 रा.खोराराम ता.जि.देविरया 2) व्यास सोहम कुमार वय.22 रा. नवतम तालुका जिल्हा देवरिया राज्य उत्तर प्रदेश आणि गौतम रामसुरन कुशवाहा वय.36 रा.मेदनापूर तालुका रुद्रपुर जिल्हा देवराई राज्य उत्तर प्रदेश अशी मृतांची नावे आहेत.
टाकीत आतमध्ये उष्णतेमुळे गॅस तयार होऊन साठलेल्या गॅसमुळे हे कर्मचारी बेशुद्ध पडून जागीच मृत्यू पावल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जातोय.
जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी 26 एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील वाडा ऍग्रो मशरूम कंपनी ही घटना घडली आहे.
मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी एक कर्मचारी खाली उतरला, मात्र बराच वेळ तो बाहेर आला नाही. तो वर येत नाही हे पाहता दुसरा कर्मचारी खाली उतरला त्यानंतर ते दोन्ही कर्मचारी वर येत नाही हे पाहून परत एक कर्मचारी खाली उतरला असता ते तिन्ही कर्मचारी बराच वेळ वरती आले नाहीत.
हे पाहून शेजारील काही व्यक्तींनी तात्काळ जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील स्लॅप फोडला आणि आत मध्ये अडकलेले या तीनही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यांना जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी नेले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे.
What's Your Reaction?