'दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली' त्या व्हायरल पत्रामुळे बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ
आय मिरर
बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना सोशल मीडियाद्वारे पाठवलेलं एक पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे बारामती मधील गुन्हेगारी आणि इतर समस्या पवार कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला गेलाय.
तर दादांच्या आकस्मित निधनामुळे बारामती पोरकी झाली अशी व्यथा देखील या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असं देखील या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांनी बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी विनंती देखील या पत्राद्वारे पवार कुटुंबीयांना करण्यात आली आहे. या व्हायरल पत्रामुळे मात्र बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
काय लिहिलं आहे पत्रात, जसं च्या तसं...
आदरणीय पवार साहेब,
आदरणीय सुनेत्रा वहिनी,
आदरणीय सुप्रिया ताई,
पार्थ दादा, जय दादा, युगेंद्र दादा,
जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती.
दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे. आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहे.
नगरपरिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. एखादा हुकूमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो, त्याच पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे.
बारामती ही केवळ एक राजकीय जागा नाही; ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबाने वर्षानुवर्षे घडवलेली विश्वासाची भूमी आहे.
म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की, बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
What's Your Reaction?