खुर्ची मिरवण्यासाठी नाही तर ज्यांनी मोठ केलं त्यांची कामं करण्यासाठी : मंत्री दत्ता भरणे

Jan 4, 2026 - 15:06
Jan 4, 2026 - 15:09
 0  605
खुर्ची मिरवण्यासाठी नाही तर ज्यांनी मोठ केलं त्यांची कामं करण्यासाठी : मंत्री दत्ता भरणे

आय मिरर 

“मी जो काही आहे तो जनतेमुळेच आहे, ही खुर्ची मिरवण्यासाठी नाही, तर ज्यांनी मोठं केलं त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आहे,” अशा भावनिक शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरकरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिर आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप समारंभात ते बोलत होते. 

या शिबिराच्या माध्यमातून तब्बल ४२७१ लाभार्थ्यांना २००६७ साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी सुमारे २५ लाखांचे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी २ कोटी ६५ लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वितरण दोन दिवस चालणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि छत्रपती कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी जि. प. सदस्य श्रीमंत ढोले,माजी जि. प. सदस्य अभिजीत तांबिले,माजी जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, माजी पं. स. सदस्य सतीश पांढरे, तसेच एलिम्को कंपनीचे के. डी. गोते, अभिलाषा ढोले, के. सी. बेहरा, कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे,श्रीराज भरणे, युवराज मस्के,मंत्री भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्री भरणे म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला तुम्ही आमदार केलं, राज्यमंत्री केलं आणि आज कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. गरीब, दिव्यांग, अपंग आणि वयोवृद्धांची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा आहे. त्यासाठी हजारो किलोमीटर जाण्याची गरज नाही, आपल्या आजूबाजूला पाहिलं तरी देव भेटतो.”

“निवडणुका येतील-जातील, पण मला राजकारण नाही तर माणुसकी जपायची आहे. गरीब माणसाच्या अपेक्षा मोठ्या नसतात, त्यांच्या अपेक्षा अगदी छोट्या छोट्या असतात. त्यांचा एखादा छोटासा काम आपण केलं तर त्याची आठवण आयुष्यभर राहते,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गरीब व गरजू घटकांसाठी “हा मामा कायम तुमच्या पाठीशी उभा असेल,” असा शब्दही त्यांनी दिला.

या कार्यक्रमासाठी स्वतः पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्र्यांशी तसेच शरद पवार साहेबांशी चर्चा करून प्रोटोकॉलनुसार परवानगी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. “लोकांसाठी काम करण्यासाठी कोणाचेही पाय धरायला मी तयार आहे,” असे भावनिक विधानही त्यांनी यावेळी केले.

एलिम्को कंपनीचे के. डी. गोते यांनी आपल्या भाषणात म्हटले की,“दिल्लीतून खास इंदापूर तालुक्यासाठी परवानगी आणली असून, भविष्यातही अशाच स्वरूपाचे आणखी शिबिर घेऊन गरजूंना मदत केली जाईल,”

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन सपकळ यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow