मुंबई || चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपाच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकारपरिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यामुळे भाजपा व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करत नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी नाना पटोले यांच्याविरुद्ध चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ८ जुन रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरांमध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांचा समक्ष बोलत असताना, भाजपाच्या काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याचे व चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन त्यांना दिल्याचे सांगितले होते. तशी बातमी देखील वृत्तपत्रात ९ जून रोजी प्रकाशित झालेली आहे.
तर, “या बातमीमध्ये गैरअर्जदार नाना पटोले यांनी भाजपाच्या कोणत्याही नगरसेवकाचे नाव उघड केलेले नसून, त्यांचेकडे कोणी लेखी निवेदन दिले आहे व कोणत्या तारखेस दिलेले आहे, हे सुद्धा नमूद केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजपाच्या सर्वच नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात झालेली आहे.” असे नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी दाखल म्हटले आहे.
तक्रारीत नेमकं काय म्हटलयं
मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व कार्यकर्ता असून, महानगरपालिका चंद्रपूरमध्ये भानापेठ वॉर्डाचा नगरसेवक आहे. त्यामुळे मला या संपूर्ण परिस्थितीचा खूप त्रास होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कधीही भेट घेतलेली नाही. तसे कोणतेही निवेदन कधीही दिलेले नाही. तरीसुद्धा माझ्या पक्षातील वरिष्ठांना तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला या बिनबुडाच्या वक्तव्यावरून उत्तरे द्यावी लागत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता भाजपावर, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर व नगरसेवकांची जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. हा प्रकार राजकीय हेतू साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूत करण्याच्या वाईट हेतूने आणि भाजपा व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे.
तर काँग्रेस म्हणते चोराच्या उलट्या बोंबा
भाजपा नगरसेवकाच्या तक्रारीवर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणतात,की चंद्रपूर शहर महानगरपालिकेत पारदर्शक कामाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपची पारदर्शक कामे चंद्रपूरकर जनतेने मागील साडेचार वर्षांत बघितली आहेत. कचरा संकलन, अमृत योजना, २०० कोटींच्या कामात लेखापरीक्षनात आक्षेप, आझाद बगीचा नूतनीकरण, प्रसिद्धीचे खासगी कंत्राट, करोना रुग्णांना भोजन वाटप अशा अनेक कामांवरून खुद्द आमसभेत मोठे वादळ उठले होते. शासनाकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत, हे त्रिवार सत्य आहे. मात्र आता सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असून सत्ता जाण्याची स्वप्ने सत्ताधारी भाजपला पडू लागली आहेत. या नैराश्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पोलिसात तक्रार करण्याचा प्रकार घडला आहे. एकंदरीत, या सर्व प्रकरणावरून चोरांच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल.