सातारा || जावळी तालुक्यातील सरताळे येथे ग्रामपंचायत शिपायाने दारूच्या नशेत गावच्या विहिरीत टीसीएल पावडरचे पूर्ण पोते टाकले. त्यामुळे पन्नासहून अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने उलट्या, जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. या रुग्णांवर वाई, पाचवड व सातारा येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार केवळ बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडरऐवजी संपूर्ण पिशवीच विहिरीमध्ये टाकली. आज सकाळी नियमितपणे नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील पन्नासवर ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरु झाला. काहींना जुलाब, तर काहींना उलट्या सुरू झाल्या.

या संदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर काही जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. काहींवर अजून उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार केवळ बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.
मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर संबंधित गावच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यामध्ये हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना उलट्या, जुलाबाची लागण झाली आहे. त्यातील सर्वांची प्रकृती चांगली असून एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विहिरीतील सर्व दूषित पाणी उपसा करण्यात आले आहे. गावामध्ये घर ते घर आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी कोणाला लागण होऊ नये याची माहिती घेत आहोत. – सतीश बुद्धे,गटविकास अधिकारी